Thursday 5 April 2012

Mumbai रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

ठाणे- वाशी मार्गावर कोपरखैरणेजवळ आज पहाटे रेल्वेने धडक दिल्यामुळे महेश मारूती धोंडे (२३) या तरुणाचा मृत्यू झाला. रेल्वेच्या धडकेमुळे तरुणाचे मुंडके तुटून नाल्यात पडले. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी १३ तास शोध घेऊनही मुंडके सापडलेच नसल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
कोपरी गावातील महेश धोंडे हा युवक धुरी डेकोरेटर्सकडे काम करत होता. आज सकाळी ६ वाजता कोपरखैरणे रेल्वे स्टेशनजवळ रूळ ओलांडत असताना त्याला रेल्वेने धडक दिली. टीव्ही १ लोकलवरील चालकाने या अपघाताविषयी माहिती वाशी स्टेशन मास्तरला दिल्यानंतर वाशी रेल्वे पोलीस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. रेल्वेच्या धडकेने महेशचा हात व डोके धडावेगळे होऊन पटरीवरून खाली नाल्यात पडले. पोलिसांनी शोध घेऊनही काहीच न सापडल्याने त्यांनी एमआयडीसीच्या अग्निशमन दलास याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांसोबत शोध मोहीम घेतल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता तुटलेला हात सापडला. पोलिसांनी धड व हात शवविच्छेदनासाठी वाशी महापालिका रुग्णालयात पाठविला आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोध घेऊनही मुंडके सापडलेच नाही.
महेशच्या खिशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचे ओळखपत्र व मोबाईल आढळला. तो मूळचा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील चिखलगाव येथील असल्याचे या ओळखपत्रावरून स्पष्ट होते. पोलिसांनी मोबाईलवरून नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर त्याचा भाऊ दत्तात्रय धोंडे रुग्णालयात हजर झाला. सायंकाळी उशिरापर्यंत मुंडके शोधण्याचे काम सुरू होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. डी. भुजबळ यांनी दिली. याविषयी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. जी. कांबळे करीत आहेत.

News source: http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=39

Wednesday 4 April 2012

Mumbai विद्यापीठ नव्हे, पोलीस छावणी

विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाच्या प्रवेशद्वारावरच आज मोठय़ा संख्येने पोलिसांची कुमक तैनात केलेली पाहायला मिळाली. सुमारे दीडशेहून अधिक पोलीस आज तैनात करण्यात आले होते. तसेच सकाळी पोलिसांच्या तीन गाड्या बाहेर उभ्या केल्या होत्या.
विद्यापीठात येणार्‍यांची संपूर्ण तपासणी करूनच आत सोडण्यात येत होते. तसेच सोबत आणलेल्या सामानाचीही झडती घेतली जात होती. कोणत्याही आंदोलनाची हवा निर्माण झाली तर विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था तसेच पोलीस यंत्रणेचा आधार घेण्याची तयारी विद्यापीठाने केलेली पाहायला मिळत आहे. मुंबई विद्यापीठात परीक्षा विभागाच्या गोंधळामुळे तसेच विद्यार्थी संघटनांनी अनेक वेळा तोडफोड केली आहे. या प्रकाराची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून विद्यापीठाने जाणीवपूर्वक सुरक्षा यंत्रणेकडे लक्ष वेधले आहे.
■ परीक्षा विभागामार्फत झालेला गोंधळ आणि पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणारी टीवाय बीकॉमच्या पेपरची फेरपरीक्षा यामुळे विद्यार्थी संघटना विरुद्ध मुंबई विद्यापीठ असे वातावरण पाहायला मिळते.
■ फेसबुकवरही विद्यापीठाच्या निषेधाच्या कमेंट पडत आहेत. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थी संघटनांना रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठ पोलीस संरक्षणाचा वापर करत असलेले दिसत आहे.
■ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. मनविसे, युवा सेना, एसएफआय, अभाविपकडून कुलगुरू हटाव ही मागणी सातत्याने जोर धरत आहे.