Monday 30 April 2012

Mumbai झोपडीदादांवर 'एमपीडीए'अन्वये कारवाईस पोलिसांची टाळाटाळ

शहरातील अनधिकृत बांधकामे प्रभावीपणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांचे आदेश असतानाही या दोन्ही यंत्रणांकडून झोपडीदादांविरुद्ध 'एमपीडीए'अन्वये कारवाई करण्याचे टाळले जात असल्याचे आढळत आहे.
उत्तर प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी ११ जानेवारी २00५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार एखाद्या व्यक्तीवर अनधिकृत कारवाई केल्यास त्वरित 'एमपीडीए'अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. तरीही, मालाड येथील संदीप माने याने अनेक अनधिकृत बांधकामे केल्याने त्याच्यावर 'एमआरटीपी'अन्वये अनेकदा कारवाई करण्यात आली तरी एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जात नसल्याने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांपासून पोलीस आयुक्तांकडे केली आहे. माने याने मालाड (पश्‍चिम) येथे शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अँग्नेलो स्कूलशेजारी अनधिकृत बांधकाम केले होते. महापालिकेने वारंवार हे बांधकाम पाडूनही ते पुन:पुन्हा उभारल्याने महापालिकेच्या लेखी तक्रारीवरून मालाड पोलिसांनी मानेविरुद्ध 'एमआरटीपी'अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, लिंक रोडवरील राजनपाडा येथे भुजाले तलावाशेजारीही त्याने केलेले अनधिकृत बांधकाम स्थानिक नगरसेविकेच्या तक्रारीवरून पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले होते. त्याशिवाय, मालाड आणि गोरेगाव पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पी उत्तर विभागाच्या सहायक पालिका आयुक्तांनीही त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, मानवाधिकार संघ, तत्कालीन उपमहापौर शैलजा गिरकर यांनीही मानेविरुद्ध 'एमपीडीए'अन्वये कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, माने यांच्यावर एमपीडीएअन्वये कारवाई करण्यासाठी आवश्यक ते निकष पूर्ण होत नसल्याने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचे मालाड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कळवले होते. मात्र, या सगळ्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.